भिवंडी दि.3 ( गांवकरी TODAY NEWS ) एका कंपनीच्या मालकासह मॅनेजरने एका व्यापाऱ्याला गुंतवणूकीतून मूळ रकमेवर ११ ते १२ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याच्या ३१ कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मालक पराग पंकज ठक्कर (४४ रा.मुलुंड पश्चिम) व मॅनेजर सागर शंकरन चिनारामपेल्ली (४५ रा.विरार पश्चिम) अशी गुन्हा दाखल झालेल्या भामट्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पराग ठक्कर यांच्या मालकीची इंडो पॅसिफिक ग्लोबल सर्व्हिसेस नावाने कंपनी आहे.सदर कंपनीत सागर हा मॅनेजर पदावर कार्यरत आहे.या दोघांनी आपसात संगनमत करून जानेवारी २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत भिवंडीतील कामतघर परिसरातील गणेश नगरमधील गणेश मंदिराजवळील वऱ्हाळदेवी अपार्टमेंटच्या ए २१ मध्ये राहणारे संदीपकुमार भगवानदास गुप्ता या व्यापाऱ्याला इंडो पॅसिफिक ग्लोबल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.व त्या रकमेवर महिन्याला ११ ते १२ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.त्यामुळे व्यापाऱ्याने कंपनीत ३१ कोटी ९५ लाख २७ हजार ३०० रुपयांची गुंतवणूक केली होती.त्यानंतर दोघा भामट्यांनी सदर रकमेची नोटरी करून व्यापाऱ्याला प्रॉमिसरी नोट देवून त्या रकमेचे गोठवलेल्या इंडलसंड बँकेचे खाते क्र.२५९९६७१२३४५६ चे ४२ चेक देवून अपहार करून फसवणूक केली आहे.याप्रकरणी व्यापारी संदीपकुमार याच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिस ठाण्यात भादविच्या कलम ४२०,४०६,३४ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोनि प्रमोद कुंभार करीत आहेत.
