भिवंडी दि.४ ( गांवकरी TODAY NEWS ) व्यवसायिकाचा विश्वास संपादन करून चार जणांनी आपसात संगनमत करीत त्याला १५१ कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून चौघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दानसिंग शेरसिंग मावरी उर्फ धरमसिंग मावरी (४५ रा.माजीवडा, ठाणे) ,अमितसिंग खाती (३२ रा.टेमघर,भिवंडी),संजय पडेल रा.समता नगर,ठाणे) व त्यांचा अन्य १ साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या भामट्यांची नावे आहेत.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी चौघांनी आपसात संगनमताने २६ मार्च २००८ ते १७ जुलै २०२३ च्या कालावधीत पारस कुमार केशुलाल जैन (६० रा.वर्तकनगर,ठाणे) यांचा विश्वासाचा गैरफायदा घेऊन सुनियोजित कट रचून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यवसायिकाची फसवणूक करून त्यांच्या नावाने खोट्या सह्या,अंगठ्याच्या सहाय्याने बनावट खरेदीखत खरे असल्याचे भासवून शासनाची व बँकेसह फिर्यादी यांच्या १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक व व्यवसायिकाने पुरवलेल्या इलेक्ट्रिक साहित्याचे १ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम न देता आर्थिक फसवणूक केली आहे.यासह फिर्यादीच्या खोट्या सह्या,अंगठे मारून अरिहंत सिटी फेज एक व दोन येथील सदनिका विक्री करून फसवणूक केलेली आहे.तर यामधील गुंतवणूकदार व तसेच त्यांचे एजंट यांच्यामार्फत फिर्यादीला फोन करुन जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करीत जबरदस्तीने धनादेशावर सही करण्यास भाग पाडीत होते.याबाबत पारसकुमार केशुलाल जैन यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दिली होती.या चौकशी नंतर गुन्हे शाखेने शांतीनगर पोलिसांकडे पाठवलेल्या पत्रानुसार शांतीनगर पोलिसांनी वरील चार आरोपींच्या विरोधात फसवणूकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे सपोनि निलेश सोनवणे करीत आहेत.
