भिवंडी दि.१५ ( गावकरी TODAY NEWS ) शहरातील नागाव भागात वार्ड क्र.४ मध्ये गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या गटाराचे सांडपाणी वाहून न जाता ते रस्त्यावर वाहून जात आहे तर काही ठिकाणी हे सांडपाणी यंत्रमाग कारखान्यात शिरत असल्याच्या तक्रारी वाढल्याने मनपाच्या बांधकाम विभागाने या गटाराचे काम नव्याने सुरु केले आहे.शहरात अनेक ठिकाणी गटारांची व ड्रेनेजची सफाई नियमित केली जात नसल्याने सांडपाणी वाहून नेणारी गटारे उंदरांनी पोखरली आहेत.

त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास बाधा येऊन ते पाणी यंत्रमाग कारखान्यात, घरात आणि रस्त्यांवर वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. महानगरपालिका प्रभाग समिती क्र.१च्या क्षेत्रातील नागाव येथील वार्ड क्र. ४ येथील समर्थ अपार्टमेंट पासून डायमंड हॉटेल धुळे कंपाऊंड नागाव पर्यंत असलेले जुने उघडे गटार नादुरुस्त होऊन त्यामधून सांडपाणी वाहून न जाता ते पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव होऊन विविध आजार पसरले होते. याबाबत भिवंडी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष अनंता सखाराम पाटील यांनी पालिकेच्या बांधकाम विभाग आणि स्वच्छता विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या आरोग्य निरीक्षकांनी अभिप्राय नगरपालिकेस सादर केला. त्याची पालिकेच्या बांधकाम विभागाने दखल घेत त्याठिकाणी नव्याने गटार बांधण्यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार ठेकेदाराने समाजसेवक अनंता पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवीत गटाराच्या कामास सुरुवात केली आहे.
