शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे डॅशिंग भिवंडी शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर नुकतेच मध्यरात्री भिवंडी शहरातील बाजारपेठेचा पाहणी दौरा केला होता. त्या दौऱ्यात भाजीपाला, फेरीवाले यांनी संपूर्ण बाजारपेठेतील रस्ता व्यापून टाकला असल्याचे निदर्शनास आले होते.

महानगरपालिकेने तीन बत्ती बाजारपेठेतील गाळे धारकांना लोखंडी राॅड लावून सीमारेषा आखून दिली होती. मात्र, कांदे- बटाटे, लसूण विक्री करणारे व इतर व्यवसायिक गाळ्याच्या पुढे इतर स्टाॅल लावून रस्ता व्यापून टाकत आहेत. त्यातच मच्छी विक्रेतेही रस्त्यावरच बसत असल्याने येण्या जाण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. साधी दुचाकी वाहनही जाऊ शकत नाही इतकी गर्दी रोज होत असते. त्यातच इतर फेरीवाले, हातगाडीवाडे रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून वस्तु विकत असल्याचे निदर्शनास आले. *तीन बत्ती ते शिवाजीनगर शिवसेना कार्यालय आणि स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनचा चारही बाजुचा संपूर्ण परिसर व सुभाष गार्डनच्या समोरील जागा या परप्रांतीय फेरीवाल्यांनी व्यापली आहे.* स्थानिकांना नोकऱ्या नसताना परप्रांतीय येथे येऊन श्रीमंत झाले आहेत. रोजचा रोकड रग्गड पैसा मिळत असल्यामुळे यांची मुजोरी वाढली आहे. भिवंडी ग्रामीण भागातून टोपलीत भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या महिलांना हे परप्रांतीय धंदा करुन देत नसल्याच्याही तक्रारी शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.
या सर्व तक्रारींची दखल घेऊन शहरप्रमुखांनी मध्यरात्रीच्या पाहणी दौऱ्यानंतर काल पोलिस उपायुक्त श्री. नवनाथ ढवळे साहेब आणि पालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ साहेब यांची भेट घेऊन तक्रारी निवेदन सादर केले. त्यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत डीसीपी यांनी भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाले यांना शिस्त लावून अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस महानगरपालिकेला सहकार्य करण्यासाठी फौजफाटा देणार असल्याचे आश्वासन दिले. पालिका आयुक्तांनी रोज हि मोहिम दोन सत्रात सुरु करण्याचे आश्वासन दिले. याबाबत शिवसेना संपूर्ण पाठीशी असल्याचे शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी सांगितले.* लवकरच ही मोहिम सुरू होऊन स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळेल आणि रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील असा आशावाद शहरप्रमुखांनी व्यक्त केला. बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS