भीमा नदीत मृतावस्थेत सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नव्हे हत्याच, चुलत्यानेच पवार कुटुंबाला संपवल्याचं समोर

महाराष्ट्र

पुण्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत (Bhima River) सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या (Suicide) नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. कौटुंबिक वादातून सात जणांची हत्या झालाचं म्हटलं जात आहे. या सात जणांची हत्या म्हणजे सुनियोजित कट असल्याचं समोर आलं आहे. अंधश्रद्धेतून हे हत्यांकड घडल्याचं म्हटलं जात आहे. त्याच प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची तीन मुले यांचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते.

पवार कुटुंब हे मूळचं अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधील आहे. 17 जानेवारी रोजी या कुटुंबाने दौंड तालुक्यातील पारगाव इथल्या नदीत आत्महत्या केल्याचे सांगितलं जातं होतं. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आलं होतं. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांना आहे. त्यावरुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.

अंधश्रद्धेतून हत्याकांड
मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांना होता. मोहन पवार आणि कुटुंबियांनी काळी जादू केली आणि त्यामुळेच धनंजयचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबाला वाटत होता. अपघात दोघांचा झाला मात्र यात फक्त धनंजयचा मृत्यू कसा झाला असा राग धनंजयच्या कुटुंबाच्या मनात होता. त्यामुळे धनंजयच्या कुटुंबीयांनी मोहन पवार यांच्या कुटुंबाचा काटा काढायचं ठरवलं होतं.

मोहन आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकलं. पाण्यात बुडून या सात जणांचा मृत्यू झाला.

दुपारी पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद
पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल आज (25 जानेवारी) दुपारी एक वाजता यासंदर्भात यवत पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते या प्रकणाबाबत अधिक माहिती देतील.

काय आहे प्रकरण?
मोहन पवार हे पत्नी, मुलगी, जावई आणि तीन मुलांसह 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. शिरुर-चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आणि 24 जानेवारी रोजी तीन मुलांचे आढळले होते. मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या रागात मोहन पवार यांनी पत्नी, मुलगी, जावई आणि नातवंडांसह सात जणांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. 17 जानेवारीच्या रात्री सात जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. परंतु ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा नातेवाईकांनी केला. त्यानंतर तपास केला असता पोलिसांनाही ही हत्या असल्याचा संशय आला. त्यांनी चार जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *